Tuesday, June 29, 2010

(घर)कर्माचा सिद्धांत

मी अनेक लोकांकडुन आणि पुस्तकांतुन त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. काहींचं बालपण "रम्य" होतं, काही थोर पुरुषांचं बालपण फार कष्टांचं होतं, काहीचं लाडाचं, काहींचं "खेड्यातलं" अशा अनेक प्रकारची वैषिष्ट्यपूर्ण बालपणे ऐकल्यावर मी म्हंटलं आपणही आपल्या बालपणाला असं काही नाव शोधावं. बराच वेळ विचार केल्यावर आणि घरच्यांशी चर्चा केल्यावर मला असं लक्षात आलं की बालपणंच नाही तर जन्मापासुन आत्तापर्यंतचं आपलं सगळं आयुष्य हे फक्त काम(चुकारपणा) करण्यात गेलं आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासारखे कमनशिबी असाल तर आधीच्या वाक्यातलं कंसाबाहेरचं मत माझं आणि कंसातलं मत घरच्याचं आहे हे ओळखायला तुम्हाला वेळ लागणार नाही. "चुकारपणा" मधे कामं चुकीची करणे आणि कामं चुकवणे हे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत याची नोंद घ्यावी. खरं तर तुमची आणि माझी परिस्थिती सारखी आहे की नाही हे ओळखणं अतिशय सोपं आहे. तुम्हाला जर चांगली कोथिंबीरीची जुडी निवडण्यापेक्षा चांगली नोकरी निवडणं सोपं वाटत असेल किंवा झेंडुच्या ढिगातुन "एकसारख्या आकाराची आणि रंगाची चांगली आणि ताजी" फुलं शोधण्यापेक्षा पुण्यातल्या लक्ष्मीरोडवर दिवाळीच्या आदल्या दिवशी बससाठी पार्किंग शोधणं सुकर आहे असं तुमचं मत असेल तर तुम्ही आणि मी "एकाच माळेचे मणी" आहोत हे नक्की!

आता आठवायला लागल्यावर असं लक्षात येतं की अगदी लहान वयात अतिशय बेमालुमपणे आपण ह्या घरातल्या कामांमधे ओढले जातो. सुरुवातिला "पेपर आणुन दे", "पाणी आण काकांसाठी" असं सांगितलं जातं आणि आपण लहान असुन ते केल्याबद्दल "अगदी सगळं कळत", "शहाणं ते बाळ" असं आपलं कौतुकही होतं. ह्या सगळ्याने आपण भारावुन जातो. हळुहळू कामांना भरती येते आणि कौतुकाला ओहोटी लागते. आणि हा हा म्हणता आपल्या नकळत कामाचं स्वरुप "(३ मजले पायर्या चढुन) ५ बादल्या पाणी आण, आज नळाला पाणी नाहिये" इथपर्यंत पोचलेलं असतं आणि "एवढे घोडे झाले तरी अक्कल म्हणुन येत नाही" हे कौतुकाचं स्वरुप झालेलं असतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की मधल्या काळात आपलं बाह्यजगातलं व्यावसायिक, कला, खेळ ई. क्षेत्रातलं यश कितीही वाढलं असलं तरी त्याचा आपल्या घरातली कामं करण्याच्या क्षमतेवर अथवा घरच्यांच्या आपल्याबद्दलच्या मतांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे इतरांच्या नजरेत आपण कितीही कर्तृत्ववान आणि यशस्वी असलो तरी घरच्यांच्या लेखी आपली पात्रता ही केवळ "साधं तुंबलेलं बेसिन दुरुस्त करता येत नाही आणि म्हणे इंजिनीयर आहे" याच पातळीवर राहते.

ऑफिसातलं काम करणं त्यामानाने फार सोपं असतं हो! "काय, कसं आणि कधीपर्यंत" एवढ्यावर निभावतं. घरातली कामं करण्याचे निकष मात्र त्या कामाच्या स्वरुपानुसार "सकाळी उठल्या उठल्या, कुठल्या वाहनाने, कुठल्या रस्त्याने जाऊन, कुठली पिशवी वापरुन, कुठल्या दराने, शनिवार पेठेतल्या कुठल्याश्या गल्लीतल्या टोकाच्या दुकानातुन" अशा कोणत्याही थराला जाऊ शकतात. घरातल्या कामांमधला सर्वात अवघड भाग म्हणजे हे असले ढोबळ आणि अतिशय सापेक्ष निकष. "एक किलो बटाटे आण" एवढ्यावर गाडी थांबत नाही. "एक किलो बटाटे आण, आणि हे बघ, ती कापडी पिशवी आहे ना, पट्ट्यापट्ट्यांची... ती नाही रे, ती तेलाची पिशवी आहे, ती कशी चालेल बटाट्यांना? जरा तरी डोकं वापरा, नुसते चांगले मार्कं मिळाले म्हणजे सगळं येत नाही ... हां, ती पिशवी. कोणाकडुनही घेऊ नकोस, त्या बाजारात जरा वयस्कं भाजीवाला आहे एक, त्याच्याकडे चांगली असते भाजी, त्याच्याकडुनच आण. १२ रु किलोच्या वर भाव नाहियेत. अगदी नाहीच मिळाले तर थोडा जास्त भाव चालेल. काटा नीट बघ एक किलो होताहेत का नाही ते. नाहीतर वेंधळ्यासारखं तो देईल ते आणाल. बटाटे तू निवडुन घे नीट. फार मोठे नको आणि फार लहानही नको, आणि त्याना मोड आलेले नको, फार ओबडधोबड आणि माती लागलेले असतिल तर आणू नको" एवढं लांबलचक भाषण म्हणजे एक काम असतं. हे सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आपण भाजीबाजारात पोचलो असता आपल्याला लक्षात येतं की सगळेच भाजीवाले "थोडे वयस्क" ह्या प्रकारात मोडणारे आहेत. लिंबापासून सुरणाच्या आकारापर्यंत सर्व आकाराच्या बटाट्यांचे ढिग सगळीकडे रचलेले आहेत आणि १५ रु किलोखाली एकाही ठिकाणी भाव नाहीये. घरातल्या कामांमधे यशस्वी होण्यासाठी सर्वात मह्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं डोकं कधीही वापरु नये. १५ रु ही किंमत १२ रु पेक्षा "थोडी जास्त" आहे की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर स्थळ, काळ, ऋतु, पर्जन्यमान, ईतर भाज्यांचे भाव यांवर अवलंबुन असल्याने ते काहीही असू शकतं. त्यामुळे ह्या आणि यासारख्या इतर अनेक गोष्टींमधे आपण स्वतःचं डोकं वापरुन काहीही काम केलंत तरी ते चूकच असतं. त्यापेक्षा पडलेल्या खेपेची पर्वा न करता सरळ घरी जाऊन "आता काय करु?" असा प्रश्न निर्लज्जपणे विचारावा आणि त्या अनुशंगाने आपल्या सामान्यज्ञानाच्या कमतरतेबद्दल उच्चारली जाणारी अपमानास्पद विधाने निमुटपणे ऐकुन घ्यावी. चुकलेल्या कामाबद्दल ऐकाव्या लागणार्या बोलण्यांपेक्षा ती कमी त्रासदायक असतात. हल्ली मोबाईलमुळे ग्रामीण भागात आणि देशात क्रांती झाली आहे असं म्हणतात. पण माझ्या मते ह्या मोबाईल फोनचा सगळ्यात जास्त फायदा "आता काय करु?" हा प्रश्न विचारण्यासाठी चार हेलपाटे घालायला लागणार्या आमच्यासारख्या लोकांनाच झाला आहे.

भाज्यांच्या आणि विशेषतः फळांत्या बाबतीत तर विधात्याने आमच्यासारख्या लोकांची फार क्रूर चेष्टा केली आहे. कारण फळ "आतुन नीट पिकलेलं आणि गोड" आहे की नाही हे आपल्याला मात्र "बाहेरुन" ओळखायचं असतं. एवढी चराचर सृष्टी निर्माण केली, एक फळ पिकलेलं आहे की नाही हे दर्शवणारी एकसारखी खुण बाहेरुन नीट दिसेल अशी सगळ्या फळांवर ठेवणं असं कितीसं अवघड होतं? बरं प्रत्येक फळासाठी हे वेगवेगळ्या पद्धतीने ओळखावं लागतं. काहूींचं रंग बघुन, काहींचा वास बघुन, काही दाबुन बघायची असतात तर काही वाजवुन! फळांचं एक तर भाज्यांचं दुसरंच. भेंडीचा देठ सहज मोडला तर ती कोवळी, तोंडली आतुन लाल नको , एक ना दोन! हे सगळं असुन आपण घेतलेली फळं बहुतांशी वेळा न पिकलेलीच असतात. अशा वेळी "मी काय करणार, गीतेत सांगितल्याप्रमाणे मी फक्त कर्म केलं, (पिकलेल्या) फळाची अपेक्षा ठेवली नाही" असा पाचकळ विनोद केला असता परिस्थिती सूधारण्याऐवजी अजुम बिकट होते हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. चांगल्या भाज्या आणि फळं ओळखण्याच्या सगळ्या खुणा जो लक्षात ठेऊ शकेल तो काय हो उद्या मराठी व्याकरणातले सगळे प्रत्यय आणि अलंकारही पाठ करेल.

पण या सगळ्या गोष्टी सुसह्य म्हणाव्यात अशी अजुन एक त्रासदायक गोष्ट म्हणजे भाव करणे अथवा घासाघीस करणे. "सांगितलेल्या किमतीला कधीही गोष्ट घ्यायची नाही" ही शिकवण लहानपणापासुन पाळण्याचा प्रयत्न करुनही माझ्यासारख्या "मुखदुर्बळ" माणसाला एका रुपयानीसुद्धा भाव कमी करता येत नाहीत. मला वाटतं माझ्यासारखी बावळट आणि बिचारी माणसं ओळखण्यासाठी भाजीवाले आणि दुकानदारांना तिसरा डोळा असावा. कारण ज्या दुकानात आई गेली असता
"फ्लॉवर कसा दिला?"
"८ रुपये पाव ताई"
"काहीही भाव काय सांगता, अर्धा किलो घ्यायचाय, नीट सांगा"
"ठिक आहे ताई, घ्या ६ रुपयानी"
असा संवाद होतो त्याच ठिकाणी मी गेल्यावर मात्र
"फ्लॉवर कसा दिला?"
" (माझ्याकडे संपू्र्ण दुर्लक्ष करत) ८ रुपये पाव"
"अहो नीट सांगा की, २ किलो घ्यायचाय"
"(वैतागलेल्या आवाजात) पाव किलो घ्या नाहीतर १० किलो, एकच भाव"
असं चित्र असतं. बोहनीसाठी ईतरांना अर्ध्या किमतीत माल विकणारे दुकानदार मला मात्र "ओ साहेब, कशाला भवानीच्या टायमाला वेळ खराब करता" असं म्हणून वाटेला लावतात.

काही कामं मात्र वर्षानुवर्ष जशीच्या तशी राहतात दळण आणणे आणि रद्दी विकणे ही रविवार सकाळ खराब करणारी कंटाळवाणी कामं इतक्या वर्षांनीदेखील माझा पिच्छा सोडत नाहीत। आधी पायी जायचो, मग सायकलवर, मग दुचाकी आणि आता चाकचाकीतुन जातो तरी या कामांचं स्वरुप आणि ती करण्याचा येणारा कंटाळा ह्यात तसुभरही फरक पडलेला नाही. ह्या कामांची एक अवस्था तर "संस्कार" ह्या नावाखाली करायला लागणार्या कामांची दुसरी. "स्वावलंबन" ह्या सदराखाली "चहा प्यायल्यावर स्वतःची कप बशी धुउन ठेवणे आणि जेवणानंतर स्वतःचं ताट उचलुन ठेवणे" अशा "हातासरशी" करायच्या कामांची मला इतकी सवय झाली की एकदा मी टपरीवजा हॉटेलात चहा पिऊन थर्माकोलचा कप विसळुन बेसिनवर पालथा घातला आहे आणि एका पंचतारांकीत हॉटेलात स्वतःचं ताट उचलुन आत नेऊन ठेवलं आहे. त्यातुन मला लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे गाळ्यातली चहाची टपरी असो अथवा पंचतारांकीत हॉटेल, "येडा का खुळा" या भावनेने आपल्याकडे बघणार्या नजरा दोन्हीकडे तितक्याच बोचर्या असतात.

कधी कधी घरातली काही कामं करण्यासाठी माणसं शोधुन आणणे हेच एक मोठं काम होऊन बसतं. प्लंबर आणि ईलेक्ट्रिशियन ह्यांचा अशा प्रकारच्या कामांच्या क्रमवारीत वरचा नंबर लागतो. पण कुठल्याही प्रकारची कामाला ही मंडळी "इतकी छोटी कामं करायला टाईम नाही आपल्याला साहेब" असं म्हणुन समोरच्या दुकानदारीशी स्थानिक राजकारणावर चर्चा करायला लागुन त्यातच त्यांच्या वेळेचा सदुपयोग आहे याची जाणिव आपल्याला करुन देतात. मग अशी कामं आपण घरीच करण्याचा प्रयत्न करतो. घरात योग्य काम करण्यासाठी योग्य अवजार सापडेल तो दिवस सुवर्णाक्षरांनी नाही तर किमान पितळ्याच्या अक्षरांनी तरी कुठेतरी लिहुन ठेवला पाहीजे. माझ्या या वाक्यामागचा कळवळा ज्यानी स्क्रू-ड्रायव्हर नाही म्हणुन सुरीच्या टोकानी स्क्रू काढणे , पकड नाही म्हणुन सांडशीने नट ढिला करणे, हातोडी नाही म्हणुन बत्त्याने खिळा ठोकणे (आणि ते करताना स्वतःच्या अंगठ्यावर बत्ता मारुन तो काळा निळा करुन घेणे) ही दिव्य पार केली असतिल त्याला कळेल.

असो, आता काय सांगावं आणि किती सांगावं? मस्त सुटीच्या दिवशी गोडाचं जेवण झालेलं असतं, निद्रादेवीचा आराधना करायला डोळे आतुर झालेले असतात, वामकुक्षी घ्यायला आपण निघणार तेवढ्यात "अरे जरा पटकन पायी जाउन कोपर्यावरुन बारीक रवा घेऊन ये पाव किलो। संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, उपमा करायचा आहे. आणि थोड्या मिरच्या पण आण, चांगल्या तिखट, मागच्या वेळेसारख्या नको ..." अशी आज्ञा ऐकू येते. "दैव देतं आणि कर्म नेतं" ह्याचा असाही अर्थ होऊ शकतो असा साक्षात्कार दैवाने दिलेली झोप हे घरकर्म नेतं तेव्हा आपल्याला होतो. संध्याकाळी येणार्या पाहुण्यांबद्दल अपशब्द पुटपुटत आपण कामाला लागतो. थोरामोठ्यानी सांगितलेले कर्माचे सिदुधांत कळण्याईतकी माझी बुद्धी नाहूी. पण माझ्या मर्यादीत बुद्धीप्रमाणे आमचा घरकर्माचा सिद्धांत एवढंच सांगतो की घरातली कामं टाळण्याचा तुम्ही केलेला प्रयत्न आणि तुम्हाला करावी लागणारी कामं ह्याची गोळाबेरीज ह्याच आयुष्यात शून्य होते. त्यामुळे आपल्याकडे येणारं प्रत्येक काम टाळंटाळ न करता तडीस नेण्याचा प्रयत्न करत राहणं हीच ह्यातुन मुक्तीची सगळ्यात सोपी वाट आहे!