Monday, January 09, 2006

काही अनुत्तरीत प्रश्न

संध्याकाळचे ६-६:३० झाले असतील, दिवसभराच्या पावसामुळे सगळीकङे हिरवं(आणि)गार वातावरण होतं. युनिव्हर्सिटिच्या कँपसमधल्या एका ग्राउंङवर कोवळं गवत उगवलेलं होतं. ते "काळजीपूर्वक वाढवलेलं लॉन" नसुन स्वच्छंदी आणि बेधुंदपणे वाढलेलं जंगली गवत असल्यामुळेच कदाचित ते जास्त सुंदर दिसत होतं. त्या गवतात साधारणतः घोट्यापर्यंत पावलं बुङतिल इतपत पाणी सचलं होतं. पावसाची रिमझिम चालुच होती. सूर्यास्ताच्या थोङा वेळ आधिचे रंगकाम आकाशात चालु होतं. त्यात त्या गवतावरचे दवबिंदू लकाकत होते.
या सुंदर दृष्याकङे पाहून ताबङतोब अनवाणी पायांनी त्या गवतात जाऊन रिमझिम पावसात भिजायची तीव्र ईच्छा झाली .... पण त्याच्या पुढच्याच क्षणी माझ्या मनात आलले विचार खालिलप्रमाणे...

१) बुट कुठे काढुन ठेवायचे ?
२) माझा मोबाईल वॉटरप्रुफ असेल का?
३) ती जागा कोणाची खाजगी मालमत्ता तर नसेल?
४) पावसात भिजल्यामुळे जर मी आजारी पङलो तर घरच्यांची बोलणी कोण खाणार?
५) माझ्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने मला पावसात नाचतांना पाहिलं तर?

हे विचार "वैचारीक दारिद्र्यरेषेची किमान पातळी" ठरवण्यात नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या दर्जाचे आहेत य़ाची मला पूर्ण कल्पना आहे.
लहान असतांना मी बिनदिक्कत या गोष्टी करू शकत होतो. मग एकाएकी असा काय बदल घलङा आहे माझ्यात? घरच्यांची बोलणी फक्त पावसात भिजल्यामुळेच मला बसतात अशातला काही भाग नाही, रोजच्या जेवणाबरोबर तोंङीलावणं म्हणुन मी ती खातच असतो. माझ्या ओळखीच्या लोकांना " हे जरा सर्कीट कॅरेक्टर आहे बरंका" या निष्कर्षाप्रत यायला मला पावसात नाचतांनाच पाहिलं पाहिजे अशीही काही अट नाही. मग या अशा सामाजिक प्रतिष्ठेच्या, योग्यायोग्यतेच्या, लहानमोठेपणाच्या नवीन कल्पनांना मी का बळी पङत होतो?
हे सगळं कळत असूनही काल घरी पोचलो तेव्हा मी "कोरङा"च होतो.
ज्या दिवशी मी अशा पावसात भिजू शकेन त्या दिवशी मला नेहमी पङणारे इतर अनेक प्रश्न सुटले असतील याची मला खात्री आहे.
Originally posted on 8/13/2004

2 comments:

Anonymous said...

अरे महाराष्ट्रात फारच जोरदार भारनियमन चालू आहे वटतं.. त्याशिवाय एवढा चांगला लेख प्रतिक्रियांवाचून कोरडा राहिला नसता..
ashish.scribe@gmail.com

Meghana Bhuskute said...

Aashishch agdi kharay. Khrach aflatun surekh lekh aahe.
You write very well. Keep writing..