Monday, January 09, 2006

पहिलं वहीलं

"लिमिट" हे मी पुरुषोत्तम साठी लिहिलेलं आणि बसवलेलं पहिलं नाटक. त्याआधी मी फरोदिया साठी "तो मी नव्हेच" लिहिलं होतं आणि लिमिटच्या आधी पुरुषोत्तम साठी "कुलुप" नावाचं एक सस्पेन्स असलेलं नाटक लिहिलं होतं. पण ते मी मित्रांना वाचुन दाखवल्यावर त्यानी मला"इतकं चांगलं नाटक लोकांना कळू न देता त्याबद्दल सस्पेन्सच ठेवलेला बरा" असं सांगुन ते नाटक मला "कुलुपात" बंद करुन ठेवायला सांगितलं.चेहर्यावरुन वाटत असलो तरी या सल्ल्यामागचा खवचटपणा न कळण्याइतका मी बावळट नाही. त्यामुळे हार न मानता मी लिमिट लिहिलंच.

तर सांगायची गोष्ट अशी की का कोण जाणे पण लिमिटचा पहिला draft लिहितांना त्यातला शेवटचा सीन म्हणजे नाटकातलं मुख्य पात्रएका स्पॉटमधे उभं राहुन नाटकाचं सार सांगणारी कविता वाचुन दाखवतं असा असावा अशी एक "प्रायोगिक" कल्पना मला सुचली. जर आधीच्यासीन्स मधे आपल्या अभिनयातुन आपले विचार मांडण्यात आपण कुठे कमी पडलो असलो तर शेवटी किमान नाटकाचं सार तरी प्रेक्षकांना पाजावंएवढाच या कवितेमागचा उदात्त हेतू होता. तुम्ही जर कधी पुरुषोत्तम केलं असेल तर ही भीषण संकल्पना अंमलात आणल्यास भरतच्या स्टेजवरकाय हैदोस होऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. पण हे वाचुन माझ्यावर "यडछाप" असा छाप मारण्यापुर्वी मीआधी म्हटल्याप्रमाणे हे माझं पुरुषोत्तमच पहिलं नाटक होतं हे जाणकारांनी लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.

त्यामुळे script लिहीतांना भावनेच्या आणि उत्साहाच्या भरात मी एक मोठ्ठीच्या मोठ्ठी कविता लिहुन काढली. पण प्रेक्षकांच्या आणिविशेषतः माझ्या सुदैवाने आपल्यासारख्याच काही जाणकारांनी वेळीच हा डाव हाणुन पाडला. मी script चे अजुन काही draft लिहिले(कविता नसलेले). नाटक झालं. आम्हाला एकाच वेळी सर्वोत्कृष्ठ नाटकाचा पुरुषोत्तम करंडक, सर्वोत्कृष्ठ प्रायोगिक नाटकाचा जयराम हार्डीकरकरंडक, मला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा गणपतराव बोडस करंडक आणि अभिनयाचे बापुसाहेब ओक पारितोषिक मिळालं. एकाच नाटकाला पुरुषोत्तमआणि जयराम हार्डीकर हे यापुर्वी स्पर्धेत फक्त एकदाच झालं होतं. सगळं काही चांगलं झालं आणि नंतर पहिल्या draft मधल्या कविता हाफक्त चेष्टेचा विषय बनुन राहिल्या.

मी काही कवी नाही (आयला, यमक जुळलं की, मी काही ... कवी नाही). पण आज जेव्हा मी त्या कवितेकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जे काही थोडंफार लिहिलं आहे त्यात ही आपली पहिली कविता आहे. ती कविता आज इथे लिहायचा विचार आहे. कविता खुप मोठी आहे. आता ५० पानांच्या नाटकाचं सार सांगायला ५ पानांची तरी कविता पाहिजेच ..... काय? आता मी ती कविती वाचली तर त्यात बर्याचगोष्टी बदलता येतील हे कळतं ... पण त्या बदलाव्याशा वाटत नाही. त्याचं कसं आहे, अनेकदा आपण एखादी गोष्ट,कला वगैरे शिकतजातो. शिकता शिकता त्यातल्या चुका सुधारत जातो. पण आपण केलेली पहिली गोष्ट, कलाकृती ही त्यातल्या सौंदर्यापेक्षा त्यातल्यात्रुटींसाठीच आपल्याला जास्त प्रिय असते. कारण नंतर आपण मनात आणलं तरी तशा त्रुटी, चुका आपण करु शकत नाही.

तुम्हाला अशा कविता वाचण्यात रस नसेल तर खरंच पुढचं वाचु नका. " फिर ये ना कहना के मैने वार्निंग नही दी थी". कविता तशी "गद्यमय पद्य" या प्रकारात मोडणारी आहे, काही ठिकाणी यमक बळंबळंच जुळवले आहे. बर्याच ठिकाणी तोच-तो पणाआहे असंही वाटू शकतं. विषय देखील थोडा "सिरीयस" प्रकारात मोडणाराच आहे. पण कशी का असेना, माझ्यासाठी ती माझी पहिली कविता आहे.


मी एवढं घाबरवल्यावर पण पुढे वाचण्याचा तुमचा अट्टाहासच असेल तर वाचकहो .. प्रस्तुत आहे .... खरं तर कविता जेव्ही लिहिलीतेव्हा ती नाटकासाठी असल्याने त्याला काही नाव वगैरे दिलं नव्हतं ... आता काहीतरी ठेवतो .... तर वाचकहो, प्रस्तुत आहे


अबाधित

कधीतरी ऐकलं होतं, की दृष्टीआडही एक सृष्टी असते,
पण त्या सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला नसते.


निर्विवाद सत्यांच्या एका सृष्टीत आपण जगतो,
कारण त्या सत्यांची सत्यता आपल्याला पडताळता येत नसते.


विश्रांतीसाठी झोप घेणं हा एकच उपाय आपल्यला ठाउक आहे,
कारण झोपेत आपले अस्तित्व आपल्यालाच जाणवत नसते.


झोपेत काय घडतं हे आपल्याला आठवच नाही,
आणि आपण काय विसरलो हे आठवण्याचा प्रयत्नही आपण करत नाही.


झोप ही विश्रांती आहे असं आपण मानतो,
तिला दुसर्या दृष्टीकोनातुन पाहण्याचा प्रयत्न करत नाही.


पण एकदा वाटलं झोप म्हणजे विसावा नसेल तर काय?
झोपेपर्यंत विश्रांती आहे, झोपेत कष्ट असतील तर काय?


झोप हा जर दरवाजा असेल, स्वप्नातुन सत्यात जाण्याचा,
मग तोच का नसेल एकमेव रस्ता, या प्रवासाच्या परतीचा?


पण मग सत्याची आणि स्वप्नाची परिभाषा काय?
या दोन जगांना विभागणारी रेषा काय?


मी खरा की माझं प्रतिबिंब हे मला कसं कळणार?
आरशाच्या आतुन बाहेरच्या स्वतःला मी कसं ओळखणार?


माझी सत्यातली ईच्छा मी स्वप्नात पूर्ण करतो,
सत्यात ज्याची भिती वाटते ते पण स्वप्नातच बघतो.


ईच्छापूर्ती जर स्वप्न असेल तर ईच्छाभंग का नसेल?
स्वप्नातलेच स्वप्न म्हणजे सत्य का नसेल?


म्हणजे ईच्छा हेच मुळ आहे का जगण्याचं?
तेच आहे का प्रतिक प्रवासातल्या दीपस्तंभाचं?


ईच्छेचा पत्ता शोधत राहणं हेच माझं काम आहे का?
त्या पत्त्याकडे जाणारा रस्ता मला माहिती आहे का?


पण ईच्छा पूर्ण झाल्यावर तरी माझा प्रवास थांबतो?
का परत एक नवीन पत्ता माझी वाट बघत असतो?


म्हणजे ईच्छापूर्ती हाही थांबा नाही का?
माझ्या प्रवासात कुठेच विसावा नाही का?


काळाला आव्हान देणं मला शक्य आहे का?
त्याच्या प्रवाहाविरुद्ध जाणं माझ्या हातात आहे का?


काळाचे दुत त्याच्या प्रवाहात अडथळा येउ देत नाहीत,
मी केलेला विरोध त्याला अपवाद असेल का?


आहे का अशी कुठली जागा जिथे काळही विसावा घेतो,
सदैव सगळ्यांना घेउन वाहणारा प्रवाहही क्षणभर थबकतो?


पण तो क्षण देखील काळाशिवाय कसा मोजणार?
काळाशिवाय क्षणाचा विचार तरी कसा करणार?


विचार .. विचार हेच मुळ आहे प्रत्येक प्रश्नाचं.
विचार हेच कारण आहे प्रत्येक उत्तराचं.


विचारांचा प्रवाह काळाशी जिंकण्याचा प्रयत्न करतो,
पण काळापुढे जाण्याचा प्रयत्न विफळ असतो.


स्वप्न आणि सत्य, दोन्हीकडे विचार आहे,
म्हणुनच त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे.


विचार नसला तर प्रश्न नसतील,
आणि त्यांचा विचार करायला लावणारी उत्तरही नसतील.


मग अशा अबाधित सत्यालाच तडा गेला तर?
विचारांची देणगी म्हणजे शाप असला तर?


आयुष्याच्या वर्तुळावर जीवनाच्या शेवटी मृत्यू दिसतो,
मृत्युच्या आधीपर्यंत जीवन असाही दृष्टीकोन असु शकतो.


मग कोणता दृष्टीकोन योग्य हो कोणी ठरवायचं?
समोरची गोष्ट कोणत्या डोळ्याने दिसते हे कसं सांगायचं?


कधीही न संपणार्या विचारांच्या रात्रीला कधी सकाळ होईल का?
मी अडकलेल्या चक्रव्युहातुन मला सुटका मिळेल का?


या विचारांचा गुंता सोडवण्यासाठी मी अजुन विचार करतो,
तेव्हा सुटलेला गुंता मला एकच गोष्ट सांगतो.


या सगळ्याचा विचार न करणं यातच याचं उत्तर आहे,
....
मृत्युनंतर नसतील विचार, एक अबाधित सत्य सांगतं
.....
या अबाधित सत्यात तरी तथ्य असेल का? मन लगेच विचारतं ......................
अमोल पळशीकर
०८।०७।२०००

No comments: