Monday, January 09, 2006

मिरवणुक, फसवणुक, हसवणुक की करमणुक

दरवर्षी अनंत चतुर्दशीला कुठेही न जाता मी घरीच असतो. माझ्या घराच्या अगदी जवळ नदी असल्यामुळे समोरच्या रस्त्यावरुन बरीच "मंडळं" विसर्जनासाठी जातात. तो "कार्यक्रम" माझ्या खोलीच्या खिडकितुन बघत बसण्यात माझा वेळ छान जातो.
यावर्षीचा देखावा काय वर्णावा !! एक तर माझ्या खिडकिच्या अगदी समोर एकमेकांपासुन २० फुटांच्या अंतरावर २ वेगवेगळ्या "सामाजिक कार्यकर्त्यांनी" उभारलेले २ "स्वागत कक्ष" होते. या स्वागत कक्षांपाशी थांबुन प्रत्येक मंडळाच्या एका प्रतिनिधीने एक नारळ फोडुन पुढे जावं अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. (चिकित्सक वाचकांसाठी - ते नारळ स्वागत कक्षांतले प्रतिनिधीच मंडळांना पुरवत होते.)
त्यापैकी एका स्वागत कक्षात एक व्यक्ती सकाळपासुन ग्रामोफोनच्या अडकलेल्या रेकॉर्डसारखा "आगतम् स्वागतम् सुस्वागतम् .... आगतम् स्वागतम् सुस्वागतम्" एवढंच म्हणत होता. पण मी काही कामासाठी २ मिनिटं आत गेलो असताना एकदम "आगतम् स्वागतम् सुस्वागतम् .. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत सर्व गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत" असं जोरदार वाक्य ऐकल्यावर त्या अडकलेल्या रेकॉर्डला पुढे ढकलण्याच्या ताकदीचे कोण "गणेशभक्त" आले आहेत हे पाहण्यासाठी उत्सुकतनं मी हातातली कामं टाकुन अक्षरशः धावतच खिडकित आलो. रस्त्यावर एक "रथाचा" देखावा असलेली गाडी होती. त्या देखाव्यात रथ ओढुन न्यायला मोर आणि हंस या दोन्हीचा भास व्हावा अशा कोण्या पक्ष्याचे चित्र होते. दोन्ही बाजुच्या पक्ष्याच्या चोचींच्या मधे अनेक स्पिकर होते. त्या "रथाच्या" आत "सारथी" "बघं बघं अगं सखे कसं बुगु बुगु वाजतंय" हे "सुप्रसिद्ध लोकगीत" (म्हणजे popular folk song :P) वाजवत होता. त्या रथासमोर ८-१० वर्षे वयोगटातील काही मुले आणि त्यांच्यापेक्षा थोडी मोठी दिसणारी पण बौद्धिक वय त्याच वयोगटातले असेल अशी शंका येणारी काही माणसे नाचत होती. आणि त्या रथाच्या "टपावर" "बालशिवाजी"च्या पोशाखात एक मुलगा आपल्या तलवारीने त्या गाण्यावर ताल धरत होता. गणेशभक्तांच्या त्या "आगळ्यावेगळ्या" दर्शनाने मला अगदी भरुन आलं.
तेवढ्यात बाजुच्या स्वागत कक्षाच्या मंचावरुन धाड! असा सुतळी बॉंम्ब फुटल्यासारखा आवाज आला. मी चमकुन त्या दिशेला पाहिलं. त्या लोकांनी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी वापरलेली युक्ती बघुन तर मी निपचितच पडलो. तिथे एक कसलिशी छोटी तोफच होती. बाजुला झेंडुची फुले होती (आचार्य अत्र्यांची नाही ... खरिखुरी फुलं). त्या झेंडुची फुलांच्या पाकळ्या तोफेच्या "तोंडी देउन" ते येणार्या प्रत्येक मंडळाला तोफेची सलामी देत होते. मी (मनात) म्हटलं छान!!! पण त्या तोफेचा नुसता आवाजच जास्त होता. बत्ती दिल्यावर त्यातल्या पाकळ्या फार तर १० फुटांपर्यंतच पोहोचत होत्या. त्या पाकळ्यांची उधळण गणेशाच्या मुर्तीवर व्हावी यासाठी ते प्रत्येक वाहनचालकाची/सारथ्याची गाडी वेगवेगळ्या पद्धतीने पार्क करण्याची जणू परिक्षाच घेत होते. त्या भाउगर्दीत एक उत्साही चालक आपल्या ट्रॅक्टरबरोबर तो स्वागत कक्षाचा मंच पण ओढुन घेउन जाता जाता थोडक्यात राहिला !!! नंतर त्यांच्याकडल्या पाकळ्या संपल्या. मग ते रस्त्यावर पडलेल्या अर्धवट जळालेल्या पाकळ्या गोळा करुन त्याच recycle करायला लागले!!!!!

ढोल-ताशांच्या ठेक्यात ज्ञानप्रबोधिनी सारख्या मंडळांचा कार्यक्रम मला आवडतो. पण यावेळी लग्नाचे बॅंड आणि speaker system चाच जास्त सुळसुळाट होता. ती खरंच विसर्जनाची मिरवणुक होती, गणरायाची काही लोकांनी केलेली फसवणुक होती का काही लोकांनी स्वतःचीच करुन घेतलेली हसवणुक होती ते मला ठाउक नाही .... पण या सगळ्यानी माझी मनसोक्त करमणुक झाली हे नक्की!!
Originally posted on 10/1/2004